Thursday, April 30, 2009

पोहे आणि मी

रात्री-अपरात्री हातातलं पुस्तक बाजूला न ठेवता आल्यानं जागत बसावं आणि सहज दोन-अडीच उलटून जावेत. घर-दार झोपलेलं. आपल्या पोटात मात्र भुकेचा आगडोंब. हातातलं पुस्तक ठेवूनही काहीतरी खायला शोधलंच पाहिजे, अशी आणीबाणी आणणारा. अशा वेळी तुम्ही काय खाता?

बिस्किटं? चिप्स? चिवडा? हॅट. पोट तर भरत नाहीच. शिवाय पित्ताला आमंत्रण. आणि खरं सांगायचं तर काही खाल्ल्याचं समाधानही मिळत नाही. अशा वेळी मी हमखास पोह्यांचा आश्रय घेते.

पोहे पुरेश्या दुधात भिजवावेत. साय असल्यास उत्तम. त्यावर पोह्यांच्या साधारण एक द्वितीयांश तरी दही घालावं. चवीपुरतं मीठ आणि तवंगासकट फोडणीची मिरची / लसणीचं तिखट / तळलेली सांडगी मिरची किंवा मग चक्क लाल तिखट. चमच्यानं किंवा हातानं. आपापल्या मगदुरानुसार कालवावेत. आणि ओरपावेत. परब्रह्म.

सकाळी सिंकमधे पडलेली खरकटी वाटी / कुंड्या / पातेलं बघून आईची दणदणीत हाक आलीच पाहिजे - जागलात वाटतं काल? उठा आता महाराणी...

दहीपोहे हा निव्वळ रात्रीच्या उपाशी जागरणांशी असोसिएट केलेला पदार्थ नसून माझ्या बाबांच्या वात्सल्याशीही तो निगडीत आहे. बर्‍याचदा संध्याकाळी बाहेरून गिळून आल्यावर 'हॅ, मला नाहीये भूक. मला नकोय जेवायला' असा आत्मविश्वासपूर्ण पुकारा करून मी परत कॉम्प्युटर / सिनेमा / टीव्ही / पुस्तक / फोन यात घुसते आणि माझी आई श्यामची आई नसल्यामुळे तीही बिनदिक्कतपणे मला वगळून स्वैपाक उरकून जेवणं उरकूनही घेते. पण साधारण साडेअकरा-बाराच्या सुमारास या कुशीवरून त्या कुशीवरून करताना किंवा पुस्तकात लक्ष न लागल्यामुळे इकडेतिकडे बघताना भूक लागल्याचं माझ्या लक्षात येतं. आईला हाक मारून उपयोग नसतो. कारण ती जागी असली तरी ढीम हलणार तर नसतेच; खेरीज 'मगाशी विचारलं तेव्हा तुला भूक नव्हती, आता का? ये बाहेरून खाऊन रोज...' इत्यादी प्रेमळ वाक्योच्चाराची दाट शक्यता असते.

अशा वेळी मॅच वगैरे चालू असल्यामुळे बाबा जागे असले, तर प्रश्नच मिटला. ते मस्तपैकी दहीपोहे कालवतात. त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठीही. आईच्या 'अहो, हे काय हे..' वगैरेकडे सोईस्कर काणाडोळा करून आमचं जागरण एकत्र साजरं होतं. दहीपोह्यांच्या साक्षीनं.

दिवाळीच्या दिवशी सकाळी मात्र हेच दहीपोहे माझ्यासाठी लीगसी असतात. पेण किंवा रत्नागिरीहून आलेले लालसर रंगाचे पोहे. गिरणीत नव्हे, भट्टीत फुलवलेले. त्यांची चव निराळीच लागते. त्यावर सायीचं दही, फोडणीची मिरची, मीठ आणि किंचित साखरही. फराळाच्या ऐवजी मी नि आई हे पोहेच खातो. आईच्या माहेरी तिला पहिल्या आंघोळीच्या सकाळी असे दहीपोहे खायला आवडत. कदाचित आजीच्या माहेरच्या गरिबीचाही धागा त्याच्याशी जोडला गेला असेल. नाहीतर दिवाळीच्या दिवशी सोन्यासारखा फराळ सोडून दहीपोहे कोण खातो? कारणं काहीही असोत. आईनं ही आठवण कधीतरी सांगितल्यापासून मीही अगदी उद्मेखून आईच्या दहीपोह्यातच सामील असते. त्या दिवशी आमची युती!

रविवार सकाळ आणि पोहे हाही एक अविभाज्य संबंध. पुरवण्यांचा पसारा घालून, एकीकडे 'रंगोली'मधली गाणी ऐकत पोहे हाणल्याशिवाय रविवार सुरूच होत नाही.

बाकी पोहे हे कांदेपोहेच असायला हवेत असं काही नाही. बटाट्याच्या काचर्‍याही पोह्यात सुरेख लागतात. पण मग पोह्यात 'ती' गंमत येत नाही. वांगीपोहे मात्र माझ्या आवडीचे. तेलात नीट खरपूस तळलं गेलेलं वांगं पोह्यासोबत असं काही जमून येतं की ज्याचं नाव ते. मटारच्या मौसमात मटार घातलेले पोहे त्याच्या रंगामुळे साजरे दिसतात. पण दाणे मधेमधेच येतात... ('गाढवाला गुळाची चव काय? मटार मधेमधे येतो म्हणे. सोलताना खातेस तेव्हा नाही का मधे येत?' इति आईसाहेब!) देशावर तर पोह्यात शेंगदाणे घालतात. पण कित्ती खरपूस तळले तरी पोह्यात शेंगदाणे? छ्या:! एक वेळ कांदा नसेल, तर कोबी घालून पोहे करीन मी - छान लागतात - पण पोह्यात शेंगदाणे? आपल्याला नाई बा पटत.

दडपे पोहे हाही माझ्या प्रेमाचा पदार्थ. स्वैपाघरातून पाटा लुप्त झाल्यामुळे ते दडपून वगैरे ठेवले जात नाहीतच. पण तरी नाव मात्र दडपे पोहेच. पोह्यावर साधी हिंग-जिरं-मोहरीची फोडणी ओतून ते कालवून घ्यायचे आणि मग त्यात पात्तळ चिरलेला कच्चा कांदा, भरपूर कोथिंबीर आणि खवलेला ओला नारळ, हिरवी मिरची बारीक चिरून, मीठ, साखर, लिंबू (कुणी कुणी टोमॅटोपण घालतात म्हणे. पण ही नक्कीच अर्वाचीन ऍडिशन असणार. आपण परंपराप्रिय!) मिसळायचं. हातानं. हे महत्त्वाचं. आणि मग दातांना व्यायाम देत देत ते खायचे. काहीसे चामट असले तरी बेफाम स्वादिष्ट. चावून चावून दात दुखायला लागतात, हिरड्या सोलवटतात - असले नाजूक नखरे अंगात असतील, तर मात्र पोह्यांना मुकलात. याच पोह्यांच्या आणि एका व्हर्जनमधे ओल्या खोबर्‍याच्या ऐवजी ताक शिंपडतात. माझ्या डाएट-दिवसांमधे मी बर्‍याचदा हीच वापरत असे. पण खरं सांगू का, कुठल्याही लो-कॅलरी पदार्थासारखाच तिच्यातही राम नाही. आणि एका आवृत्तीत पोह्यांना फोडणी देतच नाहीत. आपला काळा (किंवा गोडा) मसाला, कच्चं तेल आणि किसलेलं सुकं खोबरं. बाकी कांदा, मिरची, मीठ, साखर, लिंबू. कालवा आणि खावा. मात्र यात भाजून चुरून टाकलेला पोह्याचाच पापड 'मस्ट'.

पोह्यांच्या याच प्रेमापायी मला कोळाचे पोहे नामक फक्त वाचनातूनच भेटलेला पदार्थ खाण्याची नुसती असोशी लागून राहिलेली होती. 'इतकं नारळाचं दूध कोण काढत बसेल? आणि मग डाएटचं काय? इतके काही छान नाही लागत गं ते पोहे..' यावर आईनं माझी बोळवण केलेली. शेवटी मी 'रुचिरा' की कुठल्याश्या पुस्तकातून हुडकून एकदाचे ते पोहे केले. कच्चे पोहे, त्यावर तितकंच नारळाचं दूध. साधारण एक चतुर्थांश वगैरे चिंचेचा कोळ. मीठ. गूळ. हिरवी मिरची आणि कोथिंबीर. आयत्या वेळी मिक्स करून खायचे. पण स्वतः नारळाचं दूध काढण्याचा खटाटोप केल्यामुळे की काय कुणास ठाऊक, खरंच तितकेसे चांगले नाही लागले.

पोह्याचं डांगर हा तर सर्वज्ञात आणि लोकप्रिय प्रकार. मला मात्र तो तितकासा आवडत नाही. त्यातली पापडखाराची चव पुढे आली - आणि ती बर्‍याचदा येतेच - की सगळा रसभंग होतो. त्यापेक्षा पोह्याच्या पिठाची एक सात्विक चवीची आवृती मला प्यारी. साधारण चमचाभर पीठ आणि कपभर दूध असं एकत्र कालवावं. थोडा गूळ घालावा. कालवताना जपून कालवावं लागतं मात्र. गुठळ्या राहून चालत नाही. तसंच हावरटासारखं चमच्याभरापेक्षा जास्त पीठ घालूनही चालत नाही. ते हा हा म्हणताना फुगून बसतं. आणि पंचाईत होते. रसायन नेमक्या पोताचं आणि चवीचं जमलं, तर मात्र जे काही समाधान होतं, की बस. कम्फर्ट फूड का काय म्हणतात ते हेच, अशी खात्री पटते.

दळवी कुठेसे म्हणून गेलेत - मला मेल्यावर समुद्रात टाका. मी जन्मभर माशांवर जगलो. त्यांना एक दिवस तरी माझ्यावर जगू द्या...

त्यांचं ठीक आहे. काहीतरी मार्ग तरी होता. मी पोह्यांचं हे ऋण कसं फेडणार?

Tuesday, April 14, 2009

डाळ-पालक, भात नि काकडीची कोशिंबीर

दिवसाचे दोन सरळसोट तुकडे झालेले. हापिस आणि घर. हापिसातल्या वेळाला एक अलिप्त कोरा-करकरीत वास. नव्या छत्रीवर पहिल्यांदा पाऊस पडला की जसा येतो, तसल्या करकरीत वॉटरप्रूफ पोताचा. अजून फारश्या मैत्र्याही नाही झालेल्या. नुसतंच गोड हसून साजरं करणं. उत्साहात जिम जॉइन केल्यामुळे सगळ्या दिवसालाच कॅलरीजचा धाक. मशीनमधली कितवीतरी कॉफी घेतानाही 'साखरेचा क्यूब टाकू की नको' असा धाक आणि मोहाच्या सीमारेषेवरचा प्रश्न दर वेळी. सामोशाच्या काउंटरवरून अंमळ चिडचिड करतच स्वतःला फ्रुट बोलच्या नीरस-नॉन ग्लॅमरस पर्यायाकडे वळवणं. काळोख पसरायला लागायच्या वेळी ऐन रहदारीच्या रस्त्यावरून परतताना घराचं कुलूप काढण्यासाठी स्वतःला एनकरेज करत, वाटेवरच्या लायब्ररीचं लॉलिपॉप दाखवत दाखवत जाणं.

'अमेरिकन लेज्' आणि तत्सम इझी कम्फर्ट एस्केप्सच्या जाळ्यात सापडण्याची हीच नेमकी वेळ.

त्या दिवशी मात्र चाळा म्हणून रस्ता थोडा बदलला तर भाजीवाल्यांची एक अलीबाबा-गुहाच समोर आल्यासारखी झाली.

उच्चमध्यमवर्गीयांच्या वस्तीत असतात तसली मोनोपॉलीनं माजलेली, महागडी, ब्रोकोली + पालक + टोमॅटो + कोबी + फरसबी इतपतच माना टाकलेले पर्याय असलेली दुकानं नव्हती ती. दुकानं नव्हेतच. गाळे. भाजीवाल्यांचे गाळे.

मोडाची कडधान्यं टोपल्यांत घेऊन बसलेल्या माम्या. हिरवीगार चवळई-माठ-अंबाडी-चाकवत-मेथी-पालक, शेपू-कोथिंबीर-पुदिना. बामणी पोपटी मिरच्या नि फटाकड्या हिरव्यागार मिरच्या. त्यांच्या मधोमध आले-लिंबाचा ढीग. ताजा फडफडीत कढीपत्ता. भलेथोरले भोपळ्याचे नि कोहळ्याचे तुकडे, काळीभोर वांगी, ताजी लसलसती गवार नि घेवडी. झालंच तर कांद्याची नि लसणीचीही पात. शेवग्याच्या शेंगा. लालसर रताळी. इवले इवले कांदे. काय न् काय. भरपूर आरडाओरडा. ओयस्तो पिशव्या भरभरूनही इथे-तिथे रेंगाळणारी गिर्हाइकं. रस्त्यात मधेच टाकलेले सडक्या पाल्याचे ढीग नि त्यातून वाट काढत हिंडणारं एक चुकार ढोर.

सगळं यथासांग. परिपूर्ण. लंपनच्या भाषेत सर्वांगसुंदर.

हरखलेच मी. एकदम मूड बदलून गेला. काय घेऊ न् काय नकोसं झालेलं. पर्समधे होत्या-नव्हत्या त्या सगळ्या पिशव्या भरून हावरटासारखी भाजीच भाजी घेतली. हातात लळत-लोंबत पिशव्या आणि डोक्यात 'आता काय बरं करू जेवायला?'

मग रस्ता बदलून संध्याकाळींचा पॅटर्न ठरूनच गेला. घरात कसली पिठं-मिठं आहेत ते नीट पाहायची सवय लागली. जिरं संपलंय, आठाच्या आत गेलं तर कोपर्यावर ताजं डोसा बॅटर मिळतं, फ्रीजमधली कोथिंबीर पिवळी पडायला लागलीय, गूळ चिरला तर सोईचं होईल का, असल्या नोंदी डोक्यात आपसूक होत गेल्या. घरी गेल्यावर तसं फार श्रमाचं -वाटणाघाटणाचं-नवलपरीचं काही करायचं त्राण नसेच. नसतंच. पण 'मरू दे, एक वडासांबार खाऊ नि कॉफी ढोसू की झालं'प्रकारचा माझा निरुत्साह ओसरून गेला. जे काही करायचं ते झटपट होणारं नि सोपं तर हवंच, पण भाज्या असलेलं-कमी तेलाचं-चविष्ट हवं असा आग्रह आला त्या जागी. आठवड्यात एकदा तरी उसळ, एक तरी पालेभाजी नि ऑलमोस्ट रोज कोशिंबीर करायचीच असं ठरून गेलं. मग वाणसामानही मीच बघून आणायला सुरुवात केली. या खेपेला भुईमुगाचं तेल घेतलं, तर पुढच्या खेपेला ठरवून सूर्यफुलाचं. ताजं नाचणीचं पीठ मिळालं की लगेच घेऊन ठेवायचं. मग कधी मिळेल त्याची शाश्वती नाही. साबुदाणा एकसारख्या रंगाचा असला तरच खिचडीत गंमत. रवा अगदी जिवापाड बारीक असला की उपम्याचा सत्यानाश होतो. घराजवळच्या सुपरमार्केटात मटकी सटीसहामाशी कधीतरीच मिळते. न कंटाळता चौकशी करत राहायचं.

सुगरणींना डाव्या हाताचा मळ वाटणारी, पण माझ्याकरता भलतीच गंमतशीर असलेली ऍडव्हेंचर्सपण केली. मटकीला मोड आणले (पहिल्या फटक्यात!), दुधाला विरजण लावलं (दोनदा दूध नुसतंच फाटून फुकट गेलं. :(), तव्याला चिकटणार्या धिरड्यांच्या पिठात थोडा रवा घालून धिरडी यशस्वी केली. काही काही सपशेल फसलेले प्रयोग, काही अपघाती यश, थोडी नासधूस, पण खूप सारी धमाल.

इतके दिवस फसलेले बेत लिहिले, आता थोडे यशस्वी झालेले. हे बेत नुसतेच 'बोलाची कढी-'छापाचे नव्हेत. खरंच करून बघितलेले.

डाळ-पालक, भात नि काकडीची कोशिंबीर

साहित्य:

साधारण तीन माणसांना जेवायला पुरेलश्या हिशेबानं -

पालकाची जुडी (निवडायला सोप्पी!)

लसणीच्या सताठ पाकळ्या

एक टोमॅटो चिरून

एक हिरवी मिरची

कढीलिंबाची चार पानं

अर्धी-पाऊण वाटी तूरडाळ

फोडणीचं साहित्य नि चमचाभर मालवणी मसाला (नसला तर लाल तिखट चालतं.)

दीड वाटी तांदूळ भातासाठी.

दोन लहान काकड्या.

वाटीभर दही.

कोथिंबिरीच्या चार काड्या.

डाळ-तांदुळाचा कुकर लावताना, पालक निवडून-धुऊन-बारीक चिरून घ्यायचा आणि डाळीतच घालायचा. हिरवी मिरचीपण एक उभी चीर देऊन, देठ काढून डाळीतच घालायची. वास मस्त लागतो तिचा डाळीला.

कुकर झाला, की भात तसाच गरम राहायला ठेवून द्यायचा नि डाळ-पालक काढून रवीनं घुसळून किंवा पळीनं घाटून घ्यायचा. जिरं-मोहरीची फोडणी करून त्यात लसणीच्या पाकळ्या चांगल्या लालसर करून घ्यायच्या. मग कढीपत्ता आणि टोमॅटो टाकून परतून घ्यायचा. मग मसाला किंवा तिखट. त्याला तेल सुटलं, की डाळ-पालकाचं ते गरगट घालायचं. मीठ घालून आपल्याला हवं तितपत दाटसर होईपर्यंत थोडं पाणी घालून उकळायचं. डाळ-पालक तयार. (शेजारच्या काकींनी ही भाजी / आमटी केली की, आमच्या बाल्कनीपर्यंत दरवळ येई आणि मी कासावीस होत असे. त्यांच्याकडून पाकृ यथासांग शिकून झाली, आईच्या समोर उभं राहून करवून घेऊन झाली, तरी रामा शिवा गोविंदा! तशी चव काही केल्या येत नसे! कशी येणार? त्यांच्याकडचं तिखट म्हणजे मालवणी मसाला. आणि आमच्या ब्राम्हणी मिसळणात नुसतंच लाल तिखट! शेवटी बिचार्या भाजी केली न चुकता मला वाटीभर आणून द्यायला लागल्या. हल्ली मी या उसनवारीची मजल थेट मसाल्यापर्यंत मारून त्यांच्याच चवीची भाजी करायला लागले आहे.)

ही भाजी मला थोडी मसालेदार आवडते. पण काही जणांना नेमका तोच मसाल्याचा वास नडू शकतो. त्यांनी नुसतं लाल तिखट किंवा तेही वगळून नुसतंच हिरव्या मिरचीच्या वासावर भागवलं तरी भाजी चांगली लागते. हवं तर फोडणीत आल्याचं पातळ काप घालायचे. त्याचाही मस्त वास येतो.

काकडीची कोशिंबीर तर अगदीच सोपी. काकडी चिरून घ्यायची नि मिरचीचा एखादा तुकडा जाडा-जाडा चिरून घालायचा (काढायला सोपा). मीठ नि चिमटीभर हिंग लावून दहा मिनिटं ठेवायचं नि मग पिळून पाणी काढून टाकायचं. (या पाण्यात थोडं ताक मिसळून किंवा न मिसळताही नुसतंच प्यायला मला खूप आवडतं.) मग अगदी आयत्या वेळी दही आणि चिमटीभर साखर मिसळायची. वरून कोथिंबीर बारीक चिरून घालायची.

वाफाळलेला भात (डाएट करत नसलात तर वरून तूप. :(), उकळता डाळ-पालक आणि काकडीची कोशिंबीर.

सर्वांगसुंदर! :)

Friday, February 27, 2009

मिसळपाव



मोठ्ठ्या ब्रेकनंतर काही अपडेट्सः


१. क्ष ला काही विशिष्ट व्यक्तिविशेषांमधे असाधारण रुची निर्माण झाल्यामुळे तो भल्या पहाटे उठून ब्रेकफास्टकरिताही एक विशिष्ट हाटेल गाठू लागला आहे. त्यामुळे आमच्या स्वैपाघरातला त्याचा सक्रिय / निष्क्रिय सहभाग जवळपास बंद झाल्यात जमा आहे.


२. स्वैपाघरातील दिने दिने धाडसी प्रयोगांचा आम्हांला (अर्थात! आत्मवाचक आदरार्थी बहुवचन.) वीट आल्यामुळे आम्ही चक्क एक 'कुकबुवा' बाळगला आहे. त्याचं नाव र. (नुकताच लॉण्ड्रीतून आलेला हातरुमाल पोळ्या शेकायला घेणे व तो हातासरशी थोडासा जाळून ठेवणे, महिन्याकाठी निदान तीन तरी दांड्या मारणे, सांगितल्यापैकी अर्धाच स्वयंपाक करून कुणाचे लक्ष नाहीसे पाहून साळसूदपणे पसार होणे, कुठलीही भाजी असो - त्यात एक कांदा, बरीचशी धनिया पावडर व एखादा तरी टमाटू जिरवणे (अत्यंत तुच्छ स्वरात - टमाटर हेल्थके लिये अच्छा होता मॅडम...), उशिरा उगवल्यावर व पैसे उसने मागताना अनन्यसाधारण गोड हसून दाखवणे, अशा अनेक लीला तो लीलया करतो. पण त्याबद्दल सविस्तर परत कधीतरी. तूर्तास नुसताच पात्रपरिचय.)


३. र येऊ लागल्यानंतर सुमारे आठ दिवसांतच मी, अ आणि ब यांची पोटं आळीपाळीने बिघडली. र च्या पाककौशल्याला दोष देण्याआधीच संध्याकाळी आयत्या चहाकरता टपकलेल्या क्ष नं 'तुम्हांला घरातलं जेवण सोसत नाहीय वाट्टं' असं निरागस आवाजातलं भाष्यवजा पिल्लू सोडल्यामुळे आम्हांला आत्मपरीक्षण करणं भाग पडलं. आता सार्‍यांच्या तब्ब्येती ठीक आहेत.


अपडेट्स संपले. पदार्थ सुरू -


मी मिसळ फर्मास करते. (प्रतिक्रियांचा धुरळा विरला असल्यास पुढे जाऊ.) अ ची आई आली होती. (बरोबर. चितळ्यांच्या बाकरवड्या आणणारी. तीच ती.) तिच्यासमोर माझ्या मिसळीचं अतोनात गुणवर्णन करून झालं. अखेरीस माझ्या आळसासमोर प्रतिष्ठेचा प्रश्न जिंकला आणि र ला सुट्टी देण्यात आली. कुणाच्या तरी आईला - साक्षात आईला - माझ्याकडून माझ्या रेसिपीचे धडे घ्यायचे असल्यामुळे मी एक्सायटेड + नर्व्हस + फुशारलेली अशी होते. त्याच उत्साहात मी स्वत: बाजारहाट करून सामग्री घेऊन आले. ती येणेप्रमाणे -


आरोग्यपूर्ण व्हीट ब्रेड (इलाज नव्हता. इथे सहजासहजी आपला चविष्ट लादीपाव मिळत नाही. मिळालाच तर तो शिळा / गोडूस / भुसभुशीत असतो),


फरसाणाऐवजी हल्दीरामच्या आलू भुजिया (इथल्या फरसाणात मक्याचा गोड चिवडा घुसडतात. आणि शेव कैच्याकैच जाडजूड असते),


दही (मला मिसळीत दही आवडत नाही. गैरसमज नको. पण काहीकाही जणांना मिसळीचा सत्यानाश केलेला आवडतो. आता आपण तरी कुठवर पुरे पडणार? खा बापडे दही मिसळ),


मोड आलेलं कडधान्य (हे मी वाचकांच्या सोईकरता लिहिलेलं असलं, तरी मला मिळालं नाही. भरोश्याच्या भाजीवाल्याकडे पावटे, कुळीथ आणि वाल ही तीन कडधान्यं होती. त्याची मिसळ करण्यापेक्षा ’दगडाचा रस्सा’च्या चालीवर ’बिनकडधान्याची मिसळ’ करायचं ठरवून मी काढता पाय घेतला).


बाकीच्या गोष्टी घरात होत्याच.


आता साधारण दृश्यवर्णन हे असं -


आमच्या ३ बाय ६ च्या प्रशस्त स्वैपाघरात (फ्रीज, ओटा आणि सिंक त्यातच. आम्ही कन्नड लोकांसारखा हॉलमधे फ्रीज मांडलेला नाही यादी नोंद घ्यावी.) सफाईदारपणे कांदा बाऽऽऽऽऽऽरीक चिरणारी मी. ब स्वैपाघराच्या दाराशी घोटाळत अंदाज घेणारी. अ टीव्हीसमोर बसून उकडलेले बटाटे सोलत असलेली. अ ची आई लसूण सोलून खलबत्त्यात आलेलसणीची पेस्ट करून देणारी. आता मिसळ खायची या विचारानं प्रफुल्लित झालेले आमचे सगळ्यांचेच चेहरे.


इतक्यात पहिली माशी शिंकली. आत्मविश्वासानं फ्रीज उघडून टोमॅटो काढायला गेलेल्या मला भाजीचा नुसताच रिकामा ट्रे दिसला.


हे काय काकू? टोमॅटो संपलेत?


होय ग होय! कालच नै का आपण सार केलं? तरी कमीच पडले मला साराला टोमॅटो. नै का ग अ?


अ ’बालिका वधू’मधे रममाण झालेली. तिला सोईस्करपणे काहीच ऐकू येत नव्हतं.


असू दे. (चिडचिड लपवण्याचा निष्फळ प्रयत्न करत.)


ए ब, प्लीज एक काम कर ना ग. (आवाज वरवर मस्का लावणारा मिठ्ठास. पण चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आल्यास ’बघ बाई ब, आपल्याला सगळ्यांनाच खायचीय मिसळ’ ही गर्भित धमकी.)


पटकन खालनं टोमॅटो दे नं आणून. (निखळ आदेश.)


टोमॅटो येईस्तोवर मी यथाशक्ती माझं ज्ञान पाजळलं. हो, अ च्या आईच्या नजरेतला आदर मला गमवायचा नव्हता.


कढीपत्ता लागतो मला ताजा.


आलेलसणीची पेस्ट तर घालतेच मी भरपूर. शिवाय लसणीच्या चारसहा पाकळ्या ठेचून घालते फोडणीत. मस्त लागतात.


फोडणीत थोडी चिमटीभर साखर घालायची. म्हंजे मग सही तवंग येतो.


मालवण मसाला मेन. त्याचीच तर तरीला चव येते.


तरीला दाटपणा यावा म्हणून तांदळाची पिठी लावते मी चमचाभर. हो हो, थंड पाण्यात विरघळवून. कॉर्नफ्लॉवर लावतो नं आपण सूपला, तसंच.


अ ची आई चतुर्मासाची कहाणी ऐकावी तशी मनोभावे ऐकत असलेली.


टोमॅटो आले. फोडणी. साखर. कढीपत्ता. लसणीच्या पाकळ्या. आलेलसूण पेस्ट. कांदा-टोमॅटो. मालवण मसाला. मिश्रणाला तेल सुटून घरभर पसरलेला दरवळ. रसमवाला एखादा अण्णा ’कौनसा मसाला अम्मा?’ असं विचारत येतो का काय, असा गर्वभरित संशय मला आलेला. आता वाफवलेलं कडधान्य घालून एक वाफ काढायची. (दुसरी माशी. कडधान्य नाही. पण मी हार मानली नाही. माझ्याकडे व्हर्च्युअल कडधान्य असल्यामुळे मी इथे एक उकडलेला बटाटा चिरडून वापरला.) चव बघून थोडं लाल तिखट. मीठ. एकीकडे अ ला कांदा-कोथिंबीर-लिंबू चिरायला बसवत मी पानं मांडायला घेतली.


रटरटणार्‍या मिश्रणात चांगलं तीन फुलपात्रं पाणी ओतलं आणि उकळी येण्याची वाट बघत आतून तांदळाची पिठी काढली.
पाण्यात विरघळवलेली पिठी उकळी आलेल्या रश्श्यात ओतली मात्र -


रस्सा फसफसून वर आला.


सेकंदभर मला काही कळेचना. प्रसंग ओळखून अ, ब आणि अ ची आई तत्परतेनं माझ्या भोवती जमा झालेल्या होत्या हे सांगायला नकोच. प्रकरण आता कढईतून उतू जात होतं. शिवाय त्याला एक चमत्कारिक वासही मारत होता. धक्क्यातून सावरून थोडं संशोधन केल्यावर असं लक्षात आलं, की र नं तांदळाच्या पिठीच्या जागी खायच्या सोड्याची पुडी बेमालूमपणे ठेवलेली होती. आणि माझा निष्कारण बळी गेला होता.


पिठी आणि सोडा यांच्या टेक्श्चरमधे काही फरक असतो की नाही, ते विरघळलं नाही धड तेव्हा कळलं नाही का तुला इत्यादी मुक्ताफळं उधळली गेलीच. पण उत्तररामायणात गुंतण्यात काही फारसा अर्थ नाही.


ते प्रकरण ओतून टाकून त्या दिवशी आम्ही कामतांना राजाश्रय दिला.


शिवाय आपण असं प्रांतवादी संकुचित राहूनही चालत नाहीच नं. बंगळुरी आल्यावर आपल्याच पद्धतीचं खायचं, तर रसम कधी खाऊन बघणार? इथेच आपल्या मराठी माणसांचं चुकतं. अ च्या आईलाही ते पटलं. तिला कामतांकडचं जेवण खूपच आवडलं. तिच्याकरता लिहून दिलेली ही मिसळीची पाककृती आणि एका जुन्या यशस्वी मिसळीचा एक फोटो -



भरपूर तेलाची (जेवढं भाजीला घ्यावंसं वाटेल, त्याच्या दुप्पट तेल घ्यायचं. बरोब्बर होतं.) फोडणी करायची. नेहमीचीच. मोहरी, हिंग, हळद, थोडं लाल तिखट. त्यात कढीपत्ता, ठेचलेल्या लसणीच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा साखर घालून परतून घ्यायचं. मग आलेलसणीची पेस्ट सढळ हस्ते. तिचा वास नाक्यापर्यंत पोचला, की मग बारीक चिरलेले कांदा-टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. त्यात दीडेक चमचा मालवणी मसाला. तोही नीट परतला गेला, की मग वाफवलेलं कडधान्य. वाटाणे, मूग किंवा मटकी. ते नीट झालं की अंदाजे पाणी ओतून उकळी आणायची आणि मग तिखट-मीठ घालून तांदळाची पिठी (!!!) लावायची. तर्री तयार. मग उकडून मीठ लावून कुस्करलेल्या बटाट्याच्या फोडी, त्यावर कच्चा बारीक चिरलेला कांदा. त्यावर आपापल्या वकुबाप्रमाणे रस्सा + तवंग. वरून आलू भुजिया किंवा फरसाण. कोथिंबीर आणि लिंबाची फोड.

हाणा.

Wednesday, January 28, 2009

श्रीखंड यहीं बनाएँगे

वास्तविक गोड पदार्थांमध्ये मला सर्वांत जास्त कुठला पदार्थ आवडतो, हा एक यक्षप्रश्न आहे. म्हणजे मला गूळतूप ते रसमलाई, बर्फी ते मोदक (काजू मोदक वगळून! तो प्रकार माझ्या डोक्यात जातो.), फणसपोळी ते पुरणपोळी सर्व तितकेच प्रिय आहेत. त्यामुळे ह्या पदार्थाबद्दल लिहिताना त्याला नेमकं काय विशेषण द्यावं मला कळेना. म्हणजे "हा की नई माझा सर्वांत आवडता गोड पदार्थ आहे", असं काही गोऽड मला म्हणवेना. त्याहून काही कडू म्हणणं यथोचित होईना. नि उगीच काहीतरी म्हणावं असं काहीही सुचेना. म्हणजे थोडक्यात लेखाची काहीही रूढार्थाने आकर्षक, पुणेरी नियमांत बसणारी विनोदी किंवा अगदीच नवनीत निवडक निबंधछाप अशी प्रस्तावना म्हणून खरडायची चार वाक्य काही केल्या सुचेनात. त्यामुळे अशा रडकुंडीला आलेल्या क्षणी मला ह्या पदार्थाचं "दाटून कंठ येता" असं एक समर्पक वर्णन तेवढं सुचलं. आता ह्या मिस्टर कॉन्टिनेन्टल पदार्थाचे अतिप्रमाणात सेवन केल्यास तो घशाशी येतो, हा काही त्या पदार्थाचा अवगुण नव्हे. त्याला तसे मिट्ट गोड बनविणार्‍यांचा त्यात दोष आहे. पण म्हणून अगदीच जड हाताने साखर घालणे हा काही त्यावर उपाय नव्हे. किंबहुना तो त्याचा अपमान आहे. असं अचूक प्रमाणात साखर असलेलं श्रीखंड जमलं म्हणून मला झालेला आनंद भीषण होता. ते कसं जमलं हे मला माहित नाही. पण कसं जमलं असू शकतं ते सांगायला काय हरकत आहे? (तशीही ह्या ब्लॉगवर काय लिहावं ह्यावर मेघना सोडून इतर कुणी हरकत घ्यायचा प्रश्नच कुठे येतो? पण ते असो.)

खरं तर अमेरिकेत येऊन कित्येक दिवस मला कुठल्याही देसी दुकानात आयतं श्रीखंड काही दिसेना. हे अगदीच अनाकलनीय होतं. त्यामुळे न्यूयॉर्कच्या सर्वणा भवनमध्ये सर्वप्रथम मेनुकार्डवर श्रीखंड दिसताच मी त्यावर तुटून पडलो होतो. त्यावेळी त्याच्या मालकाला खोटे विसा मिळवून माणसांची वाहतूक करण्याच्या प्रकरणी पकडलं नव्हतं. असेल तरी मला माहित नव्हतं. हे वेळीच सांगितलेलं बरं, नाही म्हणजे कसं की, म्हंजे असं की, तर म्हंजे...आम्ही नाही ब्वा ते...तर तेही असोच. कुठेच मिळेना त्यामुळे हा पदार्थ घरीच करण्याचा माझा अनेक दिवस बेत होता. पण नकटीच्या लग्नाहून अधिक विघ्नं वाटा अडविण्यासाठी उभी. सुरुवात "जमेल का आपल्याला?" इथपासून. "हात्तिचा! त्यात काय न जमायला झालंय? चक्का घ्यायचा किंवा दही बांधून चक्का करायचा नि मग साखर घालून वर वेलची वगैरे सजावट. झालं!". बरं. मग चक्का कुठे मिळतोय मरायला त्यामुळे मग बाजारच्या दह्याचं येतं का करता, हा पुढचा प्रश्न. येत असावं बहुदा असा एक सूर. मग कुठलं दही वापरावं, ह्यावरून काही परिसंवाद. बरं एक दही म्हणून काही मिळत असतं तर सोपं होतं. पण प्लेन दही, व॓निला फ्लेवरचं दही, मग त्यात परत नो फ॓ट, लो फ॓ट, होल मिल्क नि काय नि काय. मग पुन्हा अमेरिकन दुकानातलं दही नि पटेल ब्रदर्स मधला महानंदाच्या दह्याचा बुधला (हा महानंदाच्या दह्याचा डबा खरंच बुधल्याएवढा असतो, थोडी अतिशयोक्ती वगळता.) तर अमेरिकन होल मिल्क दही किंवा महानंदाचं सायटं दही हे ठरलं. आता दही व साखर एवढंच मुद्दल हवं होतं. ते जमलं.

पण मूळ प्रश्न तो नव्हताच. आता ह्या दह्याचा चक्का कसा होणार? आता हे दही बांधणार कशात? बरीच शोधाशोध केल्यावर खादीचे मोठ्ठे हातरूमाल, खादीचे पंचे सापडले. आता वास्तविक एकदा त्यात दही महफ़ूज़ केलं की ती खादीची वस्त्रं इतर वापरास निरुपयोगी ठरू शकण्याचा संभाव्य धोका होता. परंतु श्रीखंडासाठी तेवढं माफ होतं. त्यामुळे त्या समर्पणासाठी काही विशेष कठोर व्हावं लागलं नाही. पण हे सगळं प्रकरण बांधायचं कुठे, हा प्रश्न काही सुटेना. नि अमेरिकन फ्ल॓टमधल्या अतिआटोपशीर स्वयंपाकघराचा, त्यातल्या कुचकामी फर्निचरचा नि एकंदरीत रचनेचा राग नव्याने आला. म्हणजे जिथे हे प्रकरण टांगता येईल अशी एकही जागा दिसेना. आत शिरल्यावर डावीकडे पहावं तर एक फडताळांची रांग. त्याच्यासमोर एका कोपर्‍यात फ्रिज. त्याच्याच रांगेत ग॓स नि सिंक. नि हे सोडून जे उरेल तिथे असलेलं सनमायका लावलेलं सपाट लाकूड म्हणजे ओटा. नि त्याच्या वर नि खाली पुन्हा लाकडी कपाटांची, फडताळांची रांग. एक हूक नाही, एखादा बार नाही, सिंकच्या वर काही नाही. काही काही म्हणून नाही. भिंतीत असलेल्या एका खिळ्यावर कात्रीखेरीज काहीही टांगता येण्याची सोय नाही. सिंकच्या नळाला बांधण्याचा एक पर्याय होता. पण रात्रभर झुरळांसाठी असं खाद्य टांगून ठेवणं काही बरं वाटेना. म्हणजे आमचं स्वयंपाकघर आम्ही रात्री झुरळांसाठी मोकळं करून राखून ठेवतो. रात्री ते, दिवसा आम्ही, असं चोख जागावाटप आहे. नि त्यांच्या पालनपोषणासाठी म्हणून काही रूममेट्स खरकटी भांडी, खरकटं असं सगळं त्याच्यासाठी खास रचून ठेवतात. मग स्वयंपाकघराचा असा एकही भाग नसतो की जिथे ही झुरळांची फौज रात्रभर विहार करीत नाही. आता ह्या भानगडीत ते दही कुठे टांगणार? शेवटी घरातले इतर भाग चाचपडून झाले. पण नाही. अशक्य. कुठे काही टांगायची सोय नाही. शेवटी बाथरूम मधल्या शॉवरच्या पडद्याची दांडी ही एवढी एकच सुयोग्य जागा सापडल्यावर मी माझा उत्साह आवरता घेतला. श्रीखंडाचा योग नाही, अशी मनाची अत्यंत जड अंतःकरणाने समजूत घातली.

कालांतराने पटेल ब्रदर्समध्ये श्रीखंड मिळतं असा एक शोध लागला. साहजिकच ते विकत आणलं. पण केवळ पिस्ते दाताखाली आले म्हणुन केशरपिस्ता म्हणायला, वेलची लागली म्हणून इलायची म्हणायला नि "कैरीनो ताजो रस" म्हणून मिरवणार्‍या पिशव्यांतला पपईचा आमरस नावाला दिसतोय म्हणून आम्रखंड म्हणायला माझी जीभ धजावेना. शिवाय साखर भारतीय प्रमाण घेऊन अमेरिकेत मिळणारी घालतात काय असा एक प्रश्न पडला. भारतीय साखर जेवढी घालाल त्याच्या किमान दुप्पट अमेरिकन साखर ओतल्याशिवाय पदार्थ गोड होत नाही, हे त्यांना कुणीतरी सांगणं फार फार गरजेचं आहे. त्या प्रकरणाचे सर्व उपलब्ध फ्लेवर खाऊन शेवटी मी हात टेकले नि कुठल्याही परिस्थितीत "श्रीखंड यहीं बनाएँगे" असा निर्धार केला.

पुन्हा एकदा सर्जनशीलता परजली नि एका कुठल्याशा क्षणी दही बांधण्याची एक नामी युक्ती सुचली. मग सुयोग्य मुहूर्त शोधताना १५ आ॓गस्ट जवळच असल्याचा साक्षात्कार झाला. १५ आ॓गस्टचे औचित्य साधून श्रीखंड पुरी असा बेत करण्याची इच्छा जनमानसांत व्यक्त केली. परंतु दिवाळीला करंज्या करूयात, ह्याला मिळालेल्या प्रतिसादाएवढा काही उदंड प्रतिसाद १५ आ॓गस्टला मिळेना. म्हणजे ह्याही दिवशी काही गोडधोड करावं अशी संकल्पना त्यांच्यात नसावी बहुदा. वास्तविक एकदा त्या सर्व जनांचे पासपोर्ट तपासून पहावं असं मला वाटत होतं. पण म्हटलं असो, असतील एकेकाच्या पद्धती. शिवाय आपल्याकडे काही ज्यांनी राष्ट्राप्रति निष्ठा मोजता येते अशा सावरकरवादी फूटपट्ट्या नसल्यामुळे म्हटलं राहूच देत, आपल्याला काही ते जमायचं नाही. पण लागूनच एका मित्राचा वाढदिवस असल्याचं कळलं. त्यामुळे मी १५ आ॓गस्ट व त्याचा वाढदिवस असा मौका साधला. ह्याला प्रतिसाद दांडगा मिळाला. पण त्यामुळे मला नेमकं किती दही लागणार ह्याचा अंदाज येईना. वर मातोश्रींचा सल्ला "खूप लागेल. पाणी गेल्यावर ते दही आहे त्याच्या निम्मं पण राहणार नाही. एका दह्याच्या डब्यात फार फार तर दोन जणांना पुरेल एवढं होईल." झाली पंचाईत. आता एवढ्या जनतेला पुरेल एवढं श्रीखंड करायला किती दही लागेल? त्या त्रैराशिकाने मी जरा गांगरलो. म्हणजे घरात असलेले बरेच दह्याचे डबे मी ह्या प्रकारात संपविणार होतो. पण आता म्हणजे विकत आणावं लागणार. मग शेवटी साधारण एक महानंदाचा बुधला नि चार एक अमेरिकन दह्याचे डबे असा साधारण सहा किलो दह्याचा ऐवज जमवला. साखर, वेलची, जायफळ जमवलं. केशर होतं ते शोधून ठेवलं.

१४ आ॓गस्टची रात्र. जेवणं झाल्यावर लोक झोपू लागले असताना रान जरा मोकळं झालेलं पाहून मी हळूहळू साहित्य जुळवू लागलो. प्रथम एक कचर्‍याची पिशवी (अर्थात न वापरलेली) कारपेटवर अंथरली. तिच्यावर दोन खुर्च्या एकमेकींकडे पाठ करून ठेवल्या. त्यांच्या मधोमध एक बेताचं पातेलं ठेवलं. जनता हे सर्व तिरक्या नजरेने पाहत होती. त्या खुर्च्यांच्या पाठींना असलेली मोठी भोकं मी पूर्वीच हेरून ठेवली होती. त्यानंतर पंच्यात दही कोंबलं नि करकचून गाठ मारली व पिळून जमेल तेवढं पाणी काढून टाकलं. हा सोहळा मात्र जनता अपार कुतूहलाने पाहत होती. पण जेव्हा मी स्वयंपाकघरातून लाटणं बाहेर घेऊन आलो, तेव्हा सगळे चपापले. हे काहीतरी अजबच होत होतं. मी निमूट ते दह्याचं गाठोडं लाटण्याला अडकवलं नि ते लाटणं दोन्ही खुर्च्यांच्या पाठीतून आरपार खुपसलं. पाणी पातेल्यातच गळतंय नि कारपेट कोरडंठाक आहे, ह्याची शहानिशा केली. असंच अजून एक हातरुमालाचं गाठोडं बांधलं. त्याकडे पाहून सद्दाम हुसेनला फासावर जाताना पाहून बुशला जितका आसुरी आनंद झाला असेल, त्याहून अधिक आत्मिक आनंदाने तृप्त होऊन सुखाने झोपलो.

सकाळी उठलो. तर युक्ती तरली होती. बरंच पाणी निघून होतं. उरलेलं मी अजून पिळून काढून टाकलं. ते निर्जल दही जेव्हा वस्त्रांपासून अलग केलं तेव्हा एक मुलायम, मऊसर, पाण्याचा लवलेश नसलेलं पांढरंशुभ्र प्रकरण भांड्यात साखरेची वाट पाहत होतं. महानंदाच्या सायट्या दह्याचा चक्का अधिक जमला होता ते जाता जाता केलेलं एक निरीक्षण. शेवटी आडात असावंच लागतं! सढळ हस्ते साखर टाकली. साधारण जेवढं दही उरलं होतं तितकीच. नेमकी किती ते विचारू नका. साखर घाला, ढवळा, चव घ्या. हे सगळं ते गोड होईस्तोवर. इतकं गोड की त्या क्षणी अगोड लागता कामा नये नि काही तासांनी साखर विरघळल्यावर ते मिट्ट गोड लागता कामा नये. हयाचं नेमकं माप कसं सांगणार? पण ते झक्कास जमलं खरं. त्यावर वेलची जायफळ पूड पसरून एकत्र केली. नि सगळं प्रकरण फ्रिजमध्ये संध्याकाळपर्यंत ठेवून दिलं. संध्याकाळी मित्राने थोडं केशर दुधात एकत्र करून त्यात घातलं नि ढवळलं. तोवर पुर्‍या होतच होत्या. बटाट्याची भाजीही तयार होती. हॉटेलमधून मागवलेली बिर्याणी अ॓ल्युमिनिअममधून आली होती नि कैरीनो ताजो रसचा डबा एका भांड्यात "श्रीखंड कमी पडलं तर असू देत" म्हणून उपडा झाला होता. ते कमी पडलं नाहीच. नि त्यापुढे त्या दारच्या आमरसाला कुणी शिवलंही नाही, हे वेगळं सांगायला नकोच!



ता.क. खादीचा हातरुमाल धुवून त्याचा पुनर्वापर होत आहे. त्याची हातरुमाल म्हणून वापरायची लायकी धुवूनही उरली नव्हतीच. हल्ली त्यात भिजलेली कडधान्यं मोड आणण्यासाठी बांधून ठेवतो!

Monday, September 8, 2008

उकडीच्या करंज्या

उकडीच्या करंज्या नामक पदार्थाची भारतीय, विशेषतः कोकणस्थ मराठी, पाकविश्वात भर टाकल्याचा मला भयंकर आनंद झाला आहे. त्यात भरीस भर म्हणून चाकाच्या पुनर्शोधाचं पातक कपाळी नाही. पर्यायाने नाविन्य ह्या निकषावर पैकीच्या पैकी गुण. दीडेक वर्षांपूर्वी एका मंगलसमयी आपल्या पाककलाविषयक प्रयोगांची व्याप्ती उकडीच्या मोदकांपर्यंत विस्तारावी असा विचार मनात आला. नाही म्हणायला फ्रोज़न पराठ्यांचा वीट येऊन केलेल्या पोळ्या; ज्यावर अमेरिकेतील भारतीय विद्यार्थी जगतात त्या छोले, राजमा इ. हुकमी उसळी; दिवाळी, थँक्सगिविंग अशा सणासुदीला पुर्‍या, पुलाव (एरवी मिक्स वेजीटेबलचं पाकीट ओतून शिजवलेल्या तांदळापेक्षा वेगळा भात); थालिपीठांपासून उकडीच्या भाकर्‍यांपर्यंतचे अनेक कोकणस्थी प्रकार; चिकन, कोलंबी असा सामिष आहार; शिरा, खीर, शेवयांचा शिरा, खांडवी, ओल्या नारळाच्या करंज्या अशी मिष्टान्ने वगैरे वगैरे, अशा काही यशस्वी प्रयोगांचा अनुभव गाठीशी होता. त्यामुळे हा प्रयोग करण्याचं धाडस अधिक (फाजील) आत्मविश्वास. पण एकंदरीत हा पदार्थ पाककलाविशारद होण्याच्या शेवटच्या प्रात्याक्षिक परीक्षेत येत असल्यामुळे उगीच जाहिरात केली नाही. न जाणो फसायचा नि सगळी प्रतिष्ठा धुळीला. म्हणून गुपचूपच साहित्य व कृतीची जमवाजमव सुरु केली.

उगीच मायावी जालावर चकवा लावून न घेता ग्रंथप्रमाण्य हेच अंतिम सत्य आहे असे मानून "अन्नपूर्णा"ताईंची पाककृती उघडली. २ फुलपात्रे पाणी म्हणजे नेमकं किती? उकड काढताना तांदळाचं पीठ उकळलेल्या पाण्यात वैरावे म्हणजे नेमके काय करावे? उरलेल्या उकडीच्या निवगर्‍या करण्याची पुस्ती जोडण्यापेक्षा आधीच प्रमाण बरोबर घेतलं असतं तर ही मखलाशी टाळता आली नसती काय? असे काही अभ्यासू ढंगाचे प्रश्न वाचता वाचता पडले. घरी फोन करून शंकानिरसन करून घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. "नारळ कसा खवणारेस?" हे वरती. नारळ फोडला तर एक तर खालचा भाडेकरू वरती येईल (व त्या निमित्ताने का होईना पण खाली कोण राहतं कळेल), कदाचित त्याला आमच्यापासून अलग ठेवणार्‍या लाकडाच्या फळ्या दुभंगतील, किंवा तो सरळ बाँब फुटल्याचं फोन करून पोलिसांना सांगेल, अशी परिस्थिती असताना जिथे नारळ फोडण्याचीच पंचाईत तिथे खवण्याची परिस्थिती उद्भवणार कशी? इथे ओल्या नारळाच्या करंज्यांचा अनुभव मदतीला आला. "भारतीय वाण्याकडे (क्रेडिट कार्ड घेतलं म्हणून काही वाण्याचं सुपरमार्केट होत नाही!) खवलेलं खोबरं पाकिटबंद मिळतं", ही माहिती त्वरित पुरवली. विषय संपवला असं वाटत असतानाच पुढचा प्रश्न, "मोदकाचं पीठसुद्धा मिळतं का तिथे?". मी गार. "!!!...म्हंजे?... ते वेगळं असतं? तांदळाचं तर पीठ असतं ना ते?". मी राईस फ्लार असं मिरवणार्‍या त्या दोन पौंडी पाकिटाकडे बघत होतो. "हो पण जरा वेगळं असतं", पलीकडून एक शांत उत्तर. जिथे शंभर प्रकारचे खाकरे नि थेपले मिळतात; नाना तर्‍हेच्या पनीरच्या पाककृतींसाठीचे मसाले मिळतात; इडली रवा, उडद दाल पासून चिंचेच्या चटण्या नि अगम्य भुकट्या मिळतात; त्या ठिकाणी महाराष्ट्राची प्रतिनिधी म्हणून फक्त एक कोल्हापुरी गुळाची ढेप न ढेपाळता उभी आहे, ह्याचा साक्षात्कार होऊन भारतीयत्वाचे सर्व "राज"स विचार गळून प्रांतिक विद्वेषाचे तामसी विचार मनात घर करू लागले. अशा विपरीत, प्राप्त परिस्शितीशी झुंजून मोदक करण्याचा निर्धार त्याच क्षणी पक्का केला.

मोदकाच्या कृतीमधील पहिला टप्पा म्हणजे सारण. हा सोपा टप्पा आहे. खवलेलं खोबरं आणि बारीक चिरलेला/किसलेला गूळ ३:२ ह्या प्रमाणात एकत्र करायचं. हवं तर २ भाग गुळाऐवजी, १.५ भाग गूळ नि ०.५ भाग साखर. हे बरं लागतं (का माहित नाही). हे मिश्रण मंद आचेवर ठेवून ढवळत रहायचं. हळूहळू गूळ वितळेल. गूळ पूर्ण वितळून खमंगसर वास आला की पटकन वेलची, जायफळ पूड टाकून एकत्र करून घ्यायचं. लगेच गँस बंद करायचा. सारण तयार. काहीच चुकण्याची संधीच नाही ह्यात. फक्त अति वेळ गँसवर ठेवू नये, म्हणजे चिक्कीच करायची असेल तर भाग वेगळा!

आता उकड. तांदळाचं पीठ आणि पाणी १:१ प्रमाणात. वर जितक्या वाट्या खोबरं घेतलं असेल तर तितक्याच वाट्या तांदळाचं पीठ, नि अर्थात तेवढंच पाणी. पाणी उकळवत ठेवायचं. त्यातच दोन‍तीन चमचे तेल किंवा तूप नि २ चिमटी मीठ घालायचं. पाणी उकळलं की त्यात हळूहळू तांदळाचं (उपलब्ध!)पीठ घालायचं नि एकीकडे ढवळायचं. भराभर ढवळून सगळं पाणी रीतसर पीठाने शोषून संपलं की, झाकण ठेवून एक वाफ आणायची. वाफ आली की गँस बंद करून झाकण तसंच ठेवायचं. चव ह्या दृष्टीने मोदकाची कृती येथे संपली. पुढे सगळी कलाकुसर. त्याची आपण काहीच ग्यारंटी देऊ शकत नाही. जमली तर देव पावला, नाही तर बेटर लक नेक्स्ट टाईम.

ह्यातली थोडी थोडी उकड मग तेलाच्या हाताने चांगली मळायची. मग तिचे बेताच्या आकाराचे गोळे करून पारी करायची. मुखर्‍या करून सारण भरून मोदकाचा आकार द्यायचा. ही झाली खरी कृती. पण कधी कधी काय होतं की, हा आकार देताना ते वरचं नाक अगदीच चिंकी स्टाईल नकटं होतं, किंवा चिक्कणमातीच्या खेळासारखं डागडुजी करून चिकटवलेलं वाटतं, किंवा अगदीच भोचक होतं. हे तरी ठीक पण, कधी कधी काही अपरिहार्य कारणास्तव मळलेली उकड पारी होताना "मोडेन पण वाकणार नाही" हा पवित्रा घेते. मग तेलाचे हात, पाण्याचे हात, तेल + पाण्याचे हात कश्शाकश्शाला म्हणून ती जुमानत नाही. यंदा असंच झालं. काही मोदक कसेबसे जुळवले नि शेवटी हात टेकले. शिवाय साचे वगैरे वापरून मोदक करणे हे माझ्यादृष्टिने एक भ्याडपणाचे लक्षण आहे. जे काही होईल त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. असो. मग फिनिक्स पक्ष्याप्रमाणे वगैरे मोडलेल्या पारीतून सर्जनाचा उदय झाला. त्या मळलेल्या उकडीच्या सरळ पुरीसारख्या पुर्‍या करून, सारण भरून बंद केल्या. वर पिझ्झा कटरने त्यांच्या कडा कापल्या. करंजी तयार. पिझ्झा कटरने करंज्या कातरल्या तर त्या चाकाच्या कातरण्याने होतात तशा नागमोडी कडांच्या होत नाहीत, पण कातरणं नसताना हे हत्यार खूप सोयीचं आहे. तसंही त्या हत्याराचा दुसरा काहीही उपयोग मला माहित नाही. मूळात हे हत्यार आमच्या घरी का आहे, हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे.

अशाप्रकारे तयार झालेलं उकडीचं काहीही, एका भांड्यात ठेवायचं. ते भांडं कूकरमध्ये पाण्यात ठेवायचं. कूकरचं झाकण बंद करून शिट्टी काढून गँस चालू करायचा. संतत वाफ येऊ लागल्यानंतर आठव्या ते दहाव्या मिनिटाला गँस बंद. आतलं प्रकरण बाहेर काढून निवू द्यावं. मागील वर्षी ह्यातून रीतसर मोदक बाहेर पडले. संग्रहित छायाचित्र येथे दिसत आहे. (खरं तर हे यंदाचं म्हणून खपलं असतं पण जुन्या गोष्टी हल्लीच घडल्या असं सांगून TRP वाढविण्याची गरज नसल्यामुळे ते टाळत आहे.) यंदा उकडीचे तुटलेले मोदक नि करंज्या जन्माला आल्या. तयार झालेल्या उकडीच्या करंज्यांचे छायाचित्र त्या तात्काळ संपल्यामुळे उपल्ब्ध नाही. एका मित्राच्या घरच्या गणपतीला त्यांचा रीतसर नैवेद्यही दाखविण्यात आला त्यामुळे त्यांना दैवी approval मिळाले, हे येथे विशेष नमूद करावेसे वाटते. ह्या उकडीच्या करंज्या तुपासोबत खाव्यात (खाईन तर तुपाशी, म्हणून नव्हे, genuinely!). चांगल्या लागतात, अगदी मोदकांसारख्या! (पाककृतीच्या शेवटी हे लिहिण्याची पद्धत आहे. आता एखादी पाककृती सांगितली की त्यातून निर्माण होणारं चांगलं असणार हे गृहीतक आहे की नाही? पण असं नमूद करावं लागतं, त्याशिवाय बहुदा लोक विश्वास ठेवत नाहीत!).

ता.क.: यंदाची हौस फिटली. सध्या खायला मिळण्याची आशा ठेवू नये. (जुन्याच)फोटोवर समाधान बाळगावे. "पुढल्या वर्षी लवकर आला"त तर काही चान्स आहे!

Friday, August 22, 2008

साबुदाण्याची खिचडी

परवा हापिसात नशिबाला पुजलेली इडली गिळताना नेमकी एका मराठमोळ्या सुबक ठेंगणीशी गाठ पडली. 'काय, कसं काय'वर न भागता तिचा पाकशाळेत स्वहस्ते रांधलेला डबाही दृष्टीस पडला.

अंमळ असूयेनंच मी कसंबसं म्हटलं, "वा, साबुदाण्याची खिचडी कशी काय?"

'मला साबुदाणा भिजवायचं वेळच्या वेळी आठवतं, जमतं. माझ्याकडे दाण्याचं कूटपण असतं,' असलं काहीतरी प्रामाणिक प्रॅक्टिकल उत्तर द्यावं ना? पण नाही. मस्ती. 'अय्या, तुम्ही उपास नै करत चतुर्थीला?' ऐकावं लागलं.

मग मलापण चेवच चढला. मान्य आहे, असेल बिचारी चतुर्थी-बोडण-चतुर्मास पंथातली, तर उगीच मूर्तिभंजनाचं काही कारण नव्हतं. पण एक तर मला ऑफर न करता खिचडी खातेय आणि वर ही जुर्रत? शी आस्क्ड फॉर इट, यू नो?

हिरवी चटणी भरलेलं पापलेट, बांगड्याचं कालवण, काळ्या मसाल्यातलं चिकन... इथपासून सुरुवात करून मी 'ससापण ट्राय करून पाहिलाय मी, फार नाही वेगळा लागत. मोर खाल्ला होता एकदा चंद्रपूरला गेले होते तेव्हा. तू खाल्लायस?'पर्यंत मजल मारली आणि तिच्या खिचडीचं यथाशक्ती वाट्टोळं केलं.

'खातेय मी, जरा गप बसायला काय घेशील?' हे स्पष्ट छापलं होतं तिच्या थोबाडावर. पण म्हटलं ना, खिचडीच्या बाबतीत मला नडू नये कुणी.

त्या दिवशी घरी आल्यावर पहिलं काय केलं असेल तर साबुदाण्याला जलसमाधी दिली. (साबुदाणा मिळवण्याचं क्वालिफिकेशन = साबुदाणा म्हणजे काय; नायलॉन साबुदाणा, साधा साबुदाणा आणि बारीक साबुदाणा यांतलं साम्य आणि फरक कोणते हे बंगळूरकर दुकानदाराला समजावून सांगण्याचे पेशन्स.) खिचडीत काय करायचं होतं मोठंसं? साबुदाणा भिजवायचा, तूप-जिर्‍याची फोडणी करून त्यात टाकायचा नि वरून दाण्याचं कूट मारायचं. झालं.

संध्याकाळी अ नि ब येऊन खिचडी पाहतील, तेव्हा त्यांना लाळेरं द्यावं लागेल की कसं, यावर थोडा विचार करून मी ताणून दिली.

संध्याकाळ.

अ, ब आणि क्ष.

कढईला चिकटलेला खिचडीचा लगदा.

"तूप. थोडं तूप घालून गरम कर अजून. म्हंजे मोकळी होईल ती."

"तूप? मी ऑलरेडी काकूंनी आणलेला साजूक तुपाचा डबा संपवलाय. आता उरलेलंही घातलं, तर उद्या वरण-भातावर इथलं पिवळं तूप घ्यावं लागेल. घालू?"

"न-नको."

"जिरं अजून तडतडायला हवं होतं नै?"

"माझी आई दाण्याचं कूट खूप घालते. आपल्याकडे नैये का?"

"आयडिया, आपण यात बटाटा घालून थालिपिठं लावू या याची?"

"पण अजून तूप लागेल त्याला."

"नाही, मग - हे वाईट नाही लागतेय तसं..."

"दही आहे आपल्याकडे? आणतेस प्लीज?"

खरं सांगायचं तर खिचडी तशी सुरेखच झाली होती. अ, ब नि क्षच्या अंगात नाटकंच जास्त.

पण मग आई-बाबा आले, तेव्हा मी ठेवणीतला आवाज काढून 'बॉबॉ, खिचडी नै खाल्लीय खूप दिवसांत...' असं एक वाक्य योग्य मौका पाहून हवेवर सोडून दिलं.

(नाही, त्याचं काय्ये, आमच्या आईची खिचडी काही फार सुरेख नाही होत. म्हंजे, तिला आपलं असं वाटतं, की साबुदाणा मऊ नि मोकळा भिजला, की खिचडी आपल्याला जमलीच. पण दुर्दैवानं तसं नसतं ना? तिच्या हातून धड मीठ-साखर नाही पडत. शिवाय दाण्याच्या कुटाचे मोठ्ठाल्ले गोळे होऊन बसतात. ते दाताखाली आले की कसंसंच होतं. याउलट बाबांची खिचडी काय वर्णावी... ते इतक्या मनापासून करतात ना खिचडी, की बास. थोड्या हिरव्या मिरच्या फोडणीत घालायला, हिरवा रंग तसाच राहून खिचडी छान दिसावी म्हणून थोड्या नंतर वरून घालायला, साबुदाण्यातच मिसळून घेतलेलं दाण्याचं कूट, सढळ हस्ते मीठ-साखर, छान ब्राउन करून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी. 'मिरची भाजून हवीय दह्यात?' असं तर हमखास विचारणार. वाढून घ्यायला गेलं की 'अग अग, एक वाफ निघू दे की...' आणि मग 'घे की आणिक थोडी...' असं असताना आईला कोण भाव देणार?)

तर ते वाक्य रामबाण ठरलं. दुसर्‍या दिवशी खिचडी. क्ष नेमका गावाला गेला होता, त्यामुळे त्याची हुकली. पण अ, ब आणि मी मन लावून खिचडी खाल्ली नि बाबांनी डोळे भरून पाहिलं. मग मी त्यांनी साबुदाणा भिजवायची ट्रिक विचारून घेतली. ती कृती अशी -

रात्री साबुदाणा पाण्यात नीट चोळून चोळून धुऊन घ्यायचा. भांडं कलतं केल्यावर किंचित पाणी दिसेल, इतकंच पाणी त्यात ठेवून बाकीचं ओतून टाकायचं. सकाळी साबुदाणा एकदा हातानी हलवून पाहायचा. फारच कोरडा वाटला, तर पाण्याचा एक हबका मारायचा. त्यात बरचंसं दाण्याचं कूट, मीठ, साखर असं एकत्र कालवून ठेवायचं. मग तुपात जिरं नि हिरव्या मिरच्यांची फोडणी करायची. थोड्या हिरव्या मिरच्या बाजूला ठेवायच्या हे असेलच लक्षात! त्यात बटाट्याच्या फोडी चांगल्या परतून घ्यायच्या. त्या ब्राऊन झाल्या, की वर ते साबुदाण्याचं प्रकरण घालायचं. साखर थोडी जास्तच. नि झाकण ठेवायचं नाही. नाहीतर लगदा झालाच समजायचा. साधारण नेहमीसारखी दिसायला लागली खिचडी, की ताबडतोब खायची. वर लिंबू, कोथिंबीर, नारळ असले सोपस्कार नसले तरी का-ही-ही फरक पडत नाही.

सोबत सायीचं दही आणि माझी फेवरिट भाजलेली मिरची असेल, तर जगात उपास असावेत, हे मी ब्रह्मदेवाच्या बापालाही पटवून देऊ शकते. ग्यारण्टी!

Wednesday, July 23, 2008

वांग्याचे भरीत

आईची आठवण या चित्रपटीय गळेकाढू प्रकरणातला माझ्याबाबतीत सर्वांत खरा आणि महत्त्वाचा भाग असेल, तर तो इतकाच की घरी मिळणारं आयतं, चवीपरीचं आणि पारंपरिक अन्न घराबाहेर राहिल्यावर मिळेनासं झालं. बाहेरचं खाणं ही माझ्यातल्या मुंबैकरणीला अगदी सवयीची नि आवडीची गोष्ट खरीच. पण किती झालं तरी ताकातली उकड, भाजणीची थालिपिठं, भरली वांगी, लसणीसकट दरवळणारं कुळथाचं खमंग पिठलं या गोष्टी बाहेर कशा मिळणार? आई नावाचा प्राणी अनुपस्थित. परिणामी प्रेम-वात्सल्य-माया इत्यादी तुलनेनं दुर्लक्षित गोष्टींच्या अभावापेक्षाही खरा जाणवला तो हा थेट पोटाशी येऊन भिडणारा प्रश्न.

एकोजीराजांच्या बंगळुरी मराठी खाद्यसंस्कृतीची अगदीच दुर्दशा झालेली आहे. त्यामुळे उकिरडे हुंगण्याचा प्रश्नही निकाली निघालेला. इथल्या सगळ्याच काऱ्या म्हराटी लोकांची हीच अवस्था. क्ष त्याला अपवाद नव्हताच. बरं, तो नि अ मला इथे सिनियर. त्यांची माझ्यापेक्षा काही महिने जास्त उपासमार झालेली. त्यामुळे माझं इथं आगमन होताच दोघांच्याही नजरेत ’बरी स्वैपाकीण गावली’ अशा चांदण्या लुकलुकत असलेल्या. (यथावकाश मी त्यांचा यशस्वीरित्या भ्रमनिरास केला ती गोष्ट वेगळी!)

आल्या आल्या पहिल्याच आठवड्यात क्ष चा स्वैपाकी रजेवर असल्याचं निमित्त करून आम्ही वीकान्ताआधीच जंगी बेत आखला.

वांग्याचं भरीत, तांदळाच्या भाकऱ्या नि खरडा.

माहौल साधारण हा असा -

भरताचं वांगं, तांदळाचं पीठ, कांदा-मिरची इत्यादी प्रकरण जमवून साधारण साडेदहाच्या सुमाराला अ नि क्ष माझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेले.
दोघांनीही भरताच्या आशेनं बहुधा संध्याकाळच्या न्याहारीला सुट्टी दिलेली.
खाजवायला गिटार, वाजवायला ल्यापटॉपात बरीचशी गाणी. बऱ्याच गप्पा आणि’सरदारजीची अक्कल’च्या धर्तीवर ’अण्णा लॉजिक’चे खूप सारे किस्से.
मारे वांगं भाजून, कांदे-बिंदे चिरून ठेवलेले.
तेव्हा मिक्सर प्रकरण नव्हतं, म्हणून वैद्यांकडे औषधं कुटायला असतो तसला एक संगमरवरी खलबत्ताही पैदा करून ठेवलेला.

मी घरी येऊन उकड काढण्यापासून सुरुवात केली, तेव्हा साधारण अकरा वाजले होते. एकीकडे दाणे-मिरच्या भाजल्या. खरडा कुटला. आसमंतात दरवळ होता असणार.

गरम भाकऱ्या घेऊन जेवायला बसणार, इतक्यात आम्हांला खिडकीपाशी कुणीतरी डोकावल्याचा भास झाला. भासच असणार, असा सोईस्कर समज करून घेऊन जनतेनं जेवणाखेरीज कुठेही लक्ष पुरवण्याचं नाकारलं.

परत कुणीतरी डोकावलं. रात्री बाराला हा काय प्रकार, असं म्हणतो आहोत, तोच बेलही वाजली. एक आख्खा पुरुष आहे की सोबत, असं म्हणून क्ष ला प्रचंड कॉम्प्लेक्स देत मी खिदळत दार उघडलं. तर दारात घरमालक.

वय साधारण साठीच्या आसपास. लुंगी या वस्त्रविशेषावर मोठी श्रद्धा. तांबारलेले डोळे. वर्ण - रंग गेल्यास पैसे परत.

घरात सोन्याच्या बिस्किटांची चोरून मोजदाद चाललेली असल्यासारखे संशयी भाव नजरेत.

काही कळेचना.

मग गृहस्थ क्ष कडे आपादमस्तक (अक्षरश: आपादमस्तक बरं का!) पाहून म्हणतो - ये कौन है? लडका लोग आना अलाउड नही.

पुढचा साधारण दीड तास संस्कृती, पुरोगामीपणा आणि सनातनीपणा, मसाज पार्लर चालवणाऱ्या हल्लीच्या मुली, घराची मालकी, भाड्याचे तपशील, भाडेकरूंचे हक्क, कुवॉंर मुलींच्या चारित्र्यरक्षणाची जबाबदारी... अशा गोड सुखसंवादात गेला.

क्ष बिचारा मुकाट चालता झालेला. मी नि अ ’भाडं भरूनच्या भरून पाहुणा जेवायला बोलवायची सोय नाही म्हणजे काय’ या एकाच वाक्यावर तऱ्हेतऱ्हेची फुणफुण करण्यात मग्न.

महिना भरायच्या आत आम्ही घर बदललं हे सांगणे न लगे! (पुढच्याच आठवड्यात माझ्या वाढदिवशी मुंबैकर मित्रांनी सरप्राइझ म्हणून पाठवलेला बुके रात्री बाराच्या ठोक्याला घेताना मालक, मालकांचा आडमाप वाढलेला मुलगा आणि त्यांच्या नजरेतली ’म्हटलं नव्हतं, पोरी चवचाल असणार म्हणून...’ अशी एक तुच्छ जेन्युईन छटा पाहताना करमणूक झालीच!)

पण त्या दिवशीचं ते वांग्याचं भरीत फुकट गेलंच. :(

परवा क्ष आणि क्ष च्या आणखी एका मित्रालाही आमंत्रित करून, भरीत-भाकरी-खरडा करून आम्ही समारंभानं साग्रसंगीत जेवलो. आता आमचे नवे घरमालक अत्यंत आधुनिक विचारांचे असून घरी कोणत्याही आणि कितीही मुलाला / मुलांना कधीही घेऊन येण्याची परवानगी आहे!

ही वांग्याच्या भरताची पाककृती -

एक बरंसं काळं-जांभळं गरगरीत वांगं चांगलं खरपूस भाजून घ्यावं. सोलून ठेचून घ्यावं. (देठ काढून टाकावं लागतं खरं, पण देठाजवळचा गर चोखून खायला असा खमंग लागतो, की ज्याचं नाव ते.) फोडणी करून त्यात शेंगदाणे तळून घ्यावेत आणि बाजूला काढून ठेवावेत. मग त्या तेलात फोडणी करून भरपूर हिरव्या मिरच्या (भाजलेल्या असल्यास उत्तम) आणि कांदा (हाही पातीचा मिळाला तर बरं) परतून घ्याव्यात. त्यावर ठेचलेलं वांगं घालावं आणि मग एक वाफ काढावी. मीठ, बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर आणि ते तळून ठेवलेले शेंगदाणे वर घालावेत. भरीत तयार. खरं तर ठेचलेली लसूण कांद्याबरोबर चांगली लागते. पण महाराष्ट्राच्या कोस्टल एलिमेन्टचं प्राबल्य असल्यामुळे मला हात आवरता घ्यावा लागला.

तेलावर भाजलेल्या हिरव्या मिरच्या आणि तेलावर खरपूस भाजलेले शेंगदाणे, बरीचशी कोथिंबीर आणि लसूण असं सगळं मिठासोबत भरड वाटलं की अफलातून खरडा तयार होतो. तो असला की मग भरतात लसूण नसली तरी माझी फार चरफड होत नाही!

एन्जॉय!